Sunday, June 19, 2011

आय ऍॅम अ डिस्को डान्सर...



सगळं काही नीट होत असताना मध्येच राग येतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चीडचीड होते. का? कशासाठी? कशामुळे? काहीच कळत नाही, पण असं होतं. ऑफिसचे काम लवकर संपते. नेहमी लवकर घरी पोहोचावे असे वाटत असून पोहोचता न येणार्‍याला घरी जावेसे वाटत नाही. इथे तिथे वेळ घालवूनही वेळ जात नाही. कारण काही नसते, पण असं होतं. खूप वर्षे वाट पाहिलेली संधी दारात चालून येते. मनासारखे होते, पण आनंदाचा एक अंशही जाणवत नाही. खरं तर अर्थच नाही याला, पण असं होतं.

आपले प्रचंड प्रेम असलेल्या व्यक्तीवर क्रोधाचा वर्षाव केला जातो. तसे करायचे नसते, पण नकळत घडून जाते. प्रेम अमाप असते तरी असं होतं. तरतरीत सुरू झालेल्या सकाळचा शेवट एक वैफल्यपूर्ण संध्याकाळ करते. बिघडलेले काहीच नसते. दिवसही नेहमीप्रमाणेच सरलेला असतो, पण असं होते. आपली क्षमता, कुवत माहीत असूनही कधीतरी लाचारीचे पांघरुण ओढून झोपावेसे वाटते. आपण काहीच करू शकत नाही. आपले आयुष्य व्यर्थ आहे असेच मानावेसे वाटते. तोच आत्मविश्‍वास, तीच जिद्द, तीच स्वप्नं असतात मनात, पण असं होतं.

एकटेपणाची खूप भीती वाटते. कुणीतरी सोबत असावे असे वाटते. मुद्दाम सर्वांपासून दूर राहायचा, अबोला धरायचा निर्णय आपण घेतो. गरज असते संवादाची आणि आपण तोंड लपवून पळत राहतो. करायचे असते काहीतरी, करतो वेगळेच. असेही होते. अरे पण का होते याचे उत्तर कुणालाच सापडत नाही. कदाचित ते उत्तर न सापडण्यातच जगण्याची मजा आहे. हे सगळे मनाचे खेळ. मन फुलपाखरासारखे असते. रंगीबेरंगी. कधी या फुलावर तर कधी त्या. मध्येच खूश होते. आनंदात रडवते, दु:खात हसवते. प्रगतीचा ध्यास लावते. ती मिळाली की, त्याचे महत्त्व संपवते. फुलपाखराप्रमाणे उडत राहते. पाऊस नाही पडला की, मन म्हणते ‘कसे होणार जगाचे? पावसाला काही काळजीच नाही.’ धो धो पडला की, तेच मन म्हणते, ‘अरे, काही सीमा आहे की नाही? किती पडायचे पावसाने!’ आणि अगदीच काही नाही तर म्हणते ‘पावसाचे काहीच खरं नाही, कधीही येतो आणि कधीही जातो.’ मन हे असेच.

छोट्या पोरांची मनं सांभाळण्यासाठी आपण जी मेहनत घेतो, तेवढेच श्रम आपण स्वत:चे मन सांभाळण्यासाठी घ्यायला हवे. मनाशी संवाद साधा. स्वत:च्या मनाला समजवा. ‘मूड’च्या नावाखाली काम न होणे हे योग्य नाही. मन बदलत राहते, उडत राहते, भावनांचे मंथन करते, विचारांचे पत्ते पिसते, मूड नावाच्या गुंत्यात गुंतवते. मन अक्षरश: आपल्याला नाचवते आणि आपण नाचत राहतो. काही कळतच नाही, कधी कधी बेसूर रडगाण्याचे खड्डे खणून त्याभोवती बेताल ठेके देत नाचतो. खड्ड्यात पडू या भीतीने कुढतो, पण नाचत राहतो. हा नाच नाचण्यापेक्षा मनाचे हे खेळ समजून घ्या. आपल्या बाळांचे जेवण सांडणे, धडपडणे, रडणे, हसणे, अगदी काहीही जसे ‘गोड’ किंवा ‘किऊट’ वाटते तसेच स्वत:च्या मनाच्या नाचालाही गोड मानून हसत रहा. त्या बेताल नृत्याला छान समजूतदारीचा ठेका द्या. मनाच्या खेळांची मजा घ्या. त्यात व्यापून जाऊ नका. आनंदाचा ताल धरून मनासोबत नाचा. रोज नाचा. आनंद घ्या जगण्याचा. मनाच्या उड्यांचा. उत्तरे शोधू नका. अनुभव घ्या. मनासोबत आनंदाने नाचताना खुशाल म्हणा ‘‘आय ऍम अ डिस्को डान्सर.’’

एक लाख टक्के



तेच तेच करणे, तसेच तसेच करणे आणि तेवढेच तेवढेच करणे या चक्रव्यूहात अडकलेल्यांना ‘हवे ते, हवे तसे आणि हवे तेवढे’ या संकल्पनेेचे दर्शन होत नाही. बदल माणसाला सहनच होत नाही. जगात बदल घडवून आणायच्या बोंबा मारणार्‍यांना रात्री झोपताना उशी बदललेलीही चालत नाही. आपल्याला सगळे ‘सेट’ हवे असते. कुणीतरी आधी चालून गेलेल्या मार्गावर चालणे सोपे वाटते. वेगळे काहीतरी करणार्‍याला वेड्यात काढल्याशिवाय आपण शांत बसत नाही. ‘रिस्क नको’ या मंत्राचा जप करून जगणे हे अनेकांच्या आवडीचे जगणे, पण या गर्दीत रोज नवी रिस्क घेणार्‍यांचीही कमी नाही. सागर पगारनेदेखील आयुष्यात सतत ‘रिस्क’ घेतली. 22 एप्रिल 1980 रोजी जन्मलेल्या सागरचे आडनाव ‘पगार’ असले तरी कष्ट त्याच्या वाट्याला होतेच. बालपण अगदी मजेत गेले. आई-वडिलांचे अमाप प्रेम, अभ्यास, मस्ती, मित्र असे सुंदर आयुष्य असतानाच अचानक बाबा गेले. त्याचे वडील नाना पगार हे अनेक मराठी नाटकांचे कर्तेकरविते होते. ‘लग्नाची बेडी’, ‘फुलाला सुगंध मातीचा’सारखी अनेक नाटके त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. निर्मात्याकडे कलावंतांच्या रांगा लागतात हे सागरने लहानपणापासूनच पाहिले.

वडिलांना भेटायला येणार्‍यांची गर्दीसुद्धा त्याच्या आयुष्याचा भाग होती. दादर हिंदू कॉलनीतील किंग जॉर्ज शाळेच्या सातव्या इयत्तेत असतानाच वडिलांचे निधन झाल्यावर आईनेच सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या. वडील गेल्यावर लोकांची, कलावंतांची गर्दीही नाहीशी झाली. सागर सांगतो, ‘‘बाबा खरंच गेले आहेत हे कळणे स्लो पॉयझनसारखे होते.’’ मराठी नाटक-चित्रपटांतील माणूस संपतो आणि मागे काही ठेवत नाही तसेच झाले. मालमत्ता, जमापुंजी काहीच नव्हती. आर.एम. भट शाळेत आई शिक्षिका होती. कोणतीही उणीव न जाणवू देता सागरला आईने मोठे केले. आईचीच इच्छा म्हणून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगला बी.आय.टी. कॉलेजात प्रवेश केला. या अभ्यासक्रमाचा फॉर्म भरतानाच त्याला लक्षात आले होते की, हा त्याचा प्रांत नव्हता, पण मराठी मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनीअरच झाले पाहिजे या जुनाट विचाराच्या गुंत्यात सागरही नकळत अडकला. सागर सांगतो, ‘‘कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या तिसर्‍या वर्षापर्यंत त्यांना कॉम्प्युटरला हातही लावायला मिळाला नव्हता.’’ आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तके जास्त आणि अनुभव कमी आहे असे त्याचे म्हणणे आहे. जेटकिंगमधून कॉम्प्युटर असेम्ब्लिंगचा अनुभव घेऊन त्याने कामाला लागायचे ठरवले. त्याने त्याच्या नावाची कार्डे छापली. गल्लोगल्ली फिरून ती वाटली व आपण संगणकासंबंधित सर्व कामे करतो हे सांगत फिरला. हळूहळू कामे मिळू लागली. संगणकाचे उपयोगी पार्ट विकणे सुरू केले. फॉर्मेट कॉम्प्युटर्स नाव लोकांना कळू लागले. त्यानंतर आर्यन इन्फोकॉम या कंपनीने रिटेल, होलसेल सर्वच जबाबदार्‍या घेतल्या. 50 माणसे हाताखाली काम करीत असताना सागरने एक रिस्क घेतली. कलेचा किडा सतत मनात फिरत होताच. कामावर जम बसताच चित्रपट दिग्दर्शनाचा कोर्स केला. चित्रपटांचे स्क्रिप्ट लिहिले. रमेश देव प्रॉडक्शनसाठी कामही केले. स्वत:च्या ऑफिसमध्ये 50 माणसं कामाला असताना चित्रपटाच्या सेटवर असिस्टंटचे काम केले. त्याला अनेकांनी विचारले, ‘‘तू वेडा आहेस का? हे काय चालवलंयस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘एक लाख टक्के मला मी काय करतो ते पटत आहे.’’ सागरला जगायला आवडते. खूप काही नवीन नवीन करत राहावे असे वाटते, पण कॉम्प्युटर इंजिनीअर आणि चित्रपट दिग्दर्शन...जरा चुकतंय का काही? अशा विचाराला सागरचे एकच उत्तर ‘‘मी मजेत आहे, एक लाख टक्के.’’ या प्रश्‍नांना सामोरे जाऊन झाले नाही तेवढ्यात अजून एक रिस्क घ्यायचे सागरने ठरवले. त्याची एक जपानी मैत्रीण मसाजचे प्रशिक्षण द्यायची. बुंग थॉंग मॉयचे काम पाहून त्याला सहज मनात विचार आला की, आपण एक ‘स्पा’ उघडावा. मालीश हा प्रकार आपल्या संस्कृतीत नवीन नाही. बाळंतिणीला सुईण मालीश करते. बाळांनाही मालीश केली जाते. बाईला पुढे जाऊन त्रास नको म्हणून तिला तेल लावून मालीश केली जाते. बदलत्या जगात आजीबाईचे घरगुती फंडे विसरले जात आहेत. गरम पाण्याच्या गुळण्यांची जागा स्ट्रेप्सिलसारख्या गोळ्यांनी घेतली आहे. ‘स्पा’ या शब्दाचा अर्थ लोकांना समजत नसतानाही मनात आलेली संकल्पना अस्तित्वात आणायचीच असे त्याने ठरवले.

मराठी असल्याचा मला नेहमीच फायदा झाला असे तो सांगतो. शिवाजी पार्क, दादरमध्ये एक कॉम्प्युटर इंजिनीअर ज्याने दिग्दर्शनाचा कोर्स केला आहे त्याला एक मसाज स्पा उघडायचा आहे. हे सरदारजींच्या विनोदासारखेच वाटत असताना सागरच्या आयुष्यात नेहमीप्रमाणे चमत्कार झाला. त्यालाही एक रिस्क घेणारा सापडला. श्री. पडवळ यांनी एक मराठी मुलगा काहीतरी नवीन करू इच्छितो म्हणून आपली जागा त्याला फार कमी भाड्यात दिली. वर ‘‘नाही चालले तर चावी आणून दे कधीही, कोणतेही बंधन नाही’’ असेही सांगितले. त्यावर सागर त्यांना म्हणाला, ‘‘एक लाख टक्के चालेल काका!’’ तो स्पा चाललाच. त्यानंतर जुहू, मुलुंड, ह्युजेस रोडलाही त्याच्या शाखा काढल्या. ‘एरीओपेगस’ नावाचा हा स्पा आता अनेक मोठ्या नावांचा लाडका झाला आहे. ऊर्मिला मातोंडकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, मंजिरी फडणीस, आदिती गोवित्रीकर, मलायका अरोरा, पूजा बेदी या नियमितपणे त्याच्या स्पामध्ये येतात. त्याचबरोबर सामान्य स्त्रियांनाही ‘एरीओपेगस’ आवडत आहे. त्याची बायको स्वाती त्याचा मानसिक आधार आहे. आज कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पा कंपनीच्याही एवढ्या शाखा नाहीत. मराठी माणसाला धंदा जमत नाही असे म्हणतात. कारण तो प्रामाणिक असतो. अनेक गुजरात्यांचे, मारवाड्यांचे करोडो रुपये हाताळणारा एक मराठी असतो. सागर सांगतो, ‘‘मराठी मुले खूप हुशार आहेत, त्यांना नवीन काही करायचे असते. रिस्कही घ्यायला तयार असतात, पण त्यांना चांगले काऊन्सिलिंग, चोख माहिती मिळत नसल्यामुळे ती मागे पडतात. मी इंजिनीअर झालो इच्छा नसताना ती ही रिस्क, काम सोडून दिग्दर्शन करणे हीसुद्धा रिस्क, स्पा टाकणेदेखील रिस्क... रिस्क घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही. एक लाख टक्के माझे हे मत आहे.’’

सागरला अजून स्पा टाकायचे आहेत. लोकांपर्यंत मालीश आणि त्यामागचे विज्ञान पोहोचवायचे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे. रिस्क घेत राहायची आहे. सागरशी बोलताना एक जाणवते, तो शंभर टक्के न बोलता ‘एक लाख टक्के’ असे म्हणतो. असे का? हा प्रश्‍न विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘लोक जो विचार करतात, त्याहून काहीतरी वेगळा विचार करतो मी. शंभर टक्के कमी वाटतात. त्यामुळे मी स्वत:शीदेखील एक लाख टक्क्याचाच वायदा करतो.’’ ठरवले तर आपण काहीही करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत असलो तरी स्वप्नं पाहायची हिंमत असेल तर ती साकारही करू शकता. स्वप्नांच्या शब्दकोशात ‘मर्यादा’ हा शब्द नाही. अनेक मराठी मुलांनी सागरसारखी स्वप्नं पाहावीत व ती साकारही करावीत अशी त्याची इच्छा आहे आणि मलाही तसेच वाटते.

सागरच्याच भाषेत एक लाख टक्के!

Tuesday, June 14, 2011

शेवटचा उ‘संत’



सध्या उपोषणांचा सीझन आहे. क्रिकेट, फुटबॉल किंवा ऑलिम्पिक्सचे जसे थेट प्रक्षेपण टी.व्ही.वर दाखवले जाते तसेच हे उपोषणाचे कार्यक्रमदेखील लाईव्ह टेलिकास्ट होतात. ए.सी. तंबू, वारा घालणारे सतराशे साठ चहाते, सर्व बाजूंनी कॅमेरा आणि दुनियेभरच्या गोंगाट्यातली ही उपोषणे पाहून हसावे की रडावे हे कळायचाही मार्ग नसतो. ‘मी संत आहे’ अशी पाटी गळ्यात टांगून फिरणार्‍यांनी अध्यात्म, देव आणि समाजसेवेचा जो बाजार मांडलाय त्यात ढोंग आणि फसवेगिरीखेरीज काहीच प्राप्त नाही. अनेक महाराज, अण्णा आणि बाबांच्या संतगिरीच्या धंद्याचे स्वरूप पाहून आता पटते की देवाने संत बनवायचे सोडून दिले. 11 सप्टेंबर 1895 रोजी जन्माला आलेले विनोबा भावे हे हिंदुस्थानात झालेले शेवटचे संत. त्यांच्यानंतर आलेत फक्त पंत आणि संतत्वाचा अंत. लहानपणापासून देशप्रेम आणि समाजसेवेने त्यांच्या मनात घर केले होते. हिमालयाची भीषण शांतता व ज्ञान योगाची ओढ त्यांना होती. त्याचबरोबर बंगालमधील वंदे मातरम्चे नारेही त्यांना खेचत होते. 1916 मध्ये त्यांनी घर सोडले. कुठे जावे या दुविधेत होते ते. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते व समाजसेवा करायची होती. फक्त मार्ग ठरत नव्हता. आईचा आशीर्वाद घेऊन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून निघाले. परंतु वाटेत सुरतजवळ त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.

बनारस हिंदू विद्यापीठात गांधीजींनी केलेले भाषण विनोबांनी पेपरात वाचले. त्या भाषणाचा ठसा विनोबांच्या मनावर उमटला. मनात दरवळणारे प्रश्‍न लिहून त्यांनी गांधींच्या पत्त्यावर पाठवले. उत्तरही आले. विनोबांचा आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सुरू झाला. एक दिवस गांधीजींनी लिहिले, ‘आश्रमाच्या नियमाप्रमाणे जे शिकायचे आहे त्यासाठी वेळ द्या तरच शिकाल. पत्र नकोत. आश्रमात या.’

हे आमंत्रण विनोबांच्या आयुष्यातील एक फार मोठा सण होते. त्यांचे पाय गांधीजींच्या आश्रमाकडे वळले. गांधीजींनी त्यांना आश्रमात राहायला सांगितले. पुढील काळात अहमदाबादातील आश्रमात एकटे राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला. ते नेहमी सांगत, ‘मी बंगालला गेलो नाही किंवा हिमालयातही नाही गेलो. पण गांधीजींच्या सहवासात मला त्या दोनही ठिकाणी पोहोचल्याचे सुख मिळाले. हिमालयाची शांतता आणि अन्यायविरोधाचा पराक्रम दोनही एकाच वेळी कसे घडू शकते ते मला आता कळले.’ 7 जून 1916 या दिवशी ते गांधीजींना पहिल्यांदा कोचरब आश्रमात भेटले आणि त्याच दिवसापासून आपले आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण केले. विनोबांना महान व्हायचे नव्हते. नेता व्हायचे नव्हते. गर्दी जमवायची नव्हती. ते नेहमी सांगत, ‘रोज ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. नाहीतर जगणे व्यर्थ आहे.’ 1921 साली ते आपल्या काही सहकार्यांसोबत वर्ध्याला पोहोचले. तेथे त्यांना सेठ जमनालाल बजाज भेटले. बजाज यांनी विनोबांना गुरू मानले. पवनार येथे परमधाम आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात. केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांनी बंद केला होता. याविरुद्धच्या 1924 मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले. स्वातंत्र्यलढ्यात 1932 साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन सांगितले. हेच गीता प्रवचन ‘गीताई’ झाले. याच्याशी एक गोड गोष्ट जुडलेली आहे.

विनोबा कॉलेजमध्ये असताना विनोबांची आई गीतेवरील प्रवचन ऐकायला जात असे. एकदा ती विनोबांना म्हणाली, ‘गीता संस्कृत आहे. ती मला समजत नाही. मला मराठी गीता आणून दे.’ त्यावेळी उपलब्ध होता तो ग्रंथ विनोबांनी तिला आणून दिला. तो पसंत नव्हता तरी नाइलाजाने तोच द्यावा लागला. तेव्हा आई विनोबांना म्हणाली, ‘हे पद्य तर संस्कृतइतकेच कठीण आहे. तू स्वत:च का अनुवाद करीत नाहीस?’ आपला मुलगा गीतेचा अनुवाद करू शकेल इतका आत्मविश्‍वास तिला कशामुळे वाटला असेल कोण जाणे! कदाचित तिने विनोबांचे अप्रतिम कविता लिहून अग्नीला समर्पण करणे पाहिले असेल. आईच्या या पूर्ण विश्‍वासामुळे विनोबांना फार मोठे बळ लाभले. विनोबांची आई विद्वान नव्हती की शिकली सवरलेली नव्हती. तिने कधी विनोबांना शिकवलेही नाही. उलट विनोबांनीच तिला वाचायला शिकवले होते. तिचा अत्याधिक विश्‍वास विनोबांच्या जीवनाचा पाया होता. विश्‍वास ही एक जादू आहे. अनेक धर्मग्रंथ सांगतात, ‘तू पापी आहेस, पुण्यवान हो.’ पण वेद, उपनिषदे विश्‍वासपूर्वक म्हणतात, ‘तू ब्रह्म आहेस.’ त्या माऊलीने विनोबांवर असाच विश्‍वास ठेवला. तोच विश्‍वास विनोबांनी गांधीजींवर ठेवला. आईच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी गीतेचा मराठी अनुवाद करून त्या अनुवादाला ‘गीताई’ म्हणजे गीता-आई असे नाव दिले. ही गीताई आज महाराष्ट्रात घरोघर पोहोचली आहे. विनोबांनी जे काही चिंतन, मनन केले होते आणि लिहिलेले अग्नीला समर्पण केले होते त्याचाच हा प्रसाद आहे असे विनोबांना वाटते. ही साहित्यिक कृती नसून हे धर्म-चिंतन आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जेलमध्ये विनोबा होते. त्यावेळी फाशीची शिक्षा झालेले कैदी गीताईची मागणी करीत. फाशीला चढणार्‍या एका कैद्याने डॉक्टरांच्या मार्फत विनोबांना संदेश पाठवला, ‘तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. गीताई वाचली. आता आनंदाने जातो.’ विनोबा सर्वांचे प्रिय होते.

निसर्गाचे व मुक्या प्राण्यांचे कैवारी होते ते. शांतपणे उपोषणे, साधे कपडे, गोरगरीबांची सेवा हेच त्यांचे जगणे. गांधीजींचे दोन लाडके- एक विनोबा आणि एक जवाहरलाल नेहरू. ब्राह्मण असून मांस-मच्छी व मद्यपान करणार्‍या नेहरूंना विनोबा फार आवडायचे नाहीत. गांधींच्या तोंडी विनोबांचा सारखा उल्लेखही नेहरूंना पसंत नव्हता. पण त्यांना ते सहन करण्याखेरीज उपाय नव्हता. जनता विनोबाची दिवानी होती. विनोबा नेहमीच चाहत्यांनी घेरलेले व त्यांच्या प्रवचनांना-भाषणांना खूप गर्दी असायची. या गर्दीसाठी नेहरू विनोबांजवळ जाऊ लागले. लोकांचे प्रचंड प्रेम होते विनोबांवर, नेहरूंचे नव्हते. पण प्रेम न करणारेही विनोबांकडे खेचले जायचे. विनोबांना अनेक भाषा येत. फ्रेंच व लॅटिनवर तर त्यांचे प्रभुत्व होते. 17 ऑक्टोबर 1940 पासून गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली व भावे यांची निवड केली. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. या चळवळीचा आरंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. भूमिहीन हरिजनांनी विनोबांना आपल्या वेदना सांगितल्या. गर्दीतील विनोबांच्या एका भक्ताने उठून सांगितले, ‘मी शंभर एकर जमीन तुम्हाला अर्पण करतो विनोबा.’ हे ऐकून ते थक्क झाले. अनेक शेतकर्‍यांनी आपल्या परीने जमिनी दान करणे सुरू केले. विनोबांनी मेलेली मनं जागृत केली. ही होती भूदान चळवळ. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व भूदान चळवळींसाठी विनोबा पायी फिरले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना दिली.

आपल्या आध्यात्मिक मानवतावादी विचारांच्या सहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांनाही बदलले. या सर्वांत आध्यात्मिक साधनेचा हात त्यांनी कधीच सोडला नाही. भूदान चळवळ गाजली. ‘टाइम’ मासिकाने व ‘यॉर्कर’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने विनोबांच्या साधेपणाला जगासमोर मांडले. सत्याग्रह, चळवळ, ज्ञानसाधना, शिक्षा वाटप सर्व काही केले. आणीबाणीच्या काळात इंदिराजींच्या विचाराला साथ दिली. शिस्त हवी असे सांगणार्‍या विनोबांच्या आश्रमात इंदिराजींच्याच माणसांनी काही मासिके जाळून थैमान घातले तेव्हाही ते हसलेच. त्यांचे मत होते की, ‘जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस.’ त्यांना परदेशात ‘द वॉल्किंग सेंट’ असे म्हणत. त्यांच्या पदयात्रांनी व गांधीभक्तीने त्यांना परदेशात ओळख मिळाली. 15 नोव्हेंबर 1982 मध्ये विनोबा गेले. शेवटचे दिवस आश्रमात पण सेवेतच घालवले. त्यांना 1983 मध्ये भारतरत्न दिले गेले (मरणोत्तर). माणूस मेल्याशिवाय त्याचे कौतुक करायचे नाही अशी पद्धत आहे. जीव सोडला की पुरस्कार, त्याच्या नावाने रस्ते, बागा व सिनेमे सर्व होते. पण विनोबांचे कौतुक करू तेवढे कमीच. कार्य लिहू तेवढे कमीच. त्यांनी भगवा रंग ओढून अध्यात्माची टपरी लावली नाही. कार्य केले, पण पोस्टर लावले नाही. समर्पण एवढेच त्यांनी आयुष्यभर केले. कविता लिखाण अग्नीत टाकले आणि स्वत:च्या जीवाची आहुती समाजसेवेच्या अग्नीकुंडात दिली. हल्लीच्या बाबांनी व संत होण्याची इच्छा बाळगणार्‍यांनी विनोबांचे आयुष्य समजून घ्यावे. अमेरिकेचा प्रवास करून परतलेल्या एका मद्रासी गृहस्थाने विनोबांना विचारले, ‘विज्ञानात बाह्य कसोटी असते तशी आत्मज्ञानात असते का?’ विनोबा हसत म्हणाले, ‘एक थप्पड मारून पहावे, रागावला तर समजावे की हा आत्मज्ञानी नाही, अजून कच्चा आहे!’ विनोबा भावे हे हिंदुस्थानात झालेले शेवटचे संत. त्यानंतर झाले ते दुकानदार.

Sunday, June 5, 2011

लाईफ कसले!



एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण. परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता!’
सिग्नलला गाडी थांबते. चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण. २-३ रुपये द्यावे असे मनात येते. रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो. तेवढ्यात सिग्नल सुटतो. गाडी पुढे घ्यायची वेळ येते. थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला!’

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्‍वासाने सांगतो. त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात. वाईट वाटते खूप. नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो. ‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो. जेवणाची सुट्टी संपते. तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो. क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

‘तुमच्या पोराची धावपळ पाहतो आम्ही. कसल्या परिस्थितीत तो एवढा मोठा झाला. कधी त्याच्या त्रासाची, कर्जाची आणि ओझ्याची झळ त्याने घरी लागू दिली नाही’ असे शेजारच्यांकडून एकून डोळ्यात पाणी येते. वाटते ‘आपणही आपल्या पोराला कधीतरी शाब्बास म्हणायला हवे होते.’

असेच होते नेहमी. छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात. खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात. गेलेले क्षण परत येत नाहीत. राहतो तो ‘खेद’, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा. जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ करा. आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका. चांगल्या गोष्टीची दाद द्या, आवडले नाही तर सांगा, घुसमटू नका. त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा. नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही. आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या. त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे. आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले. आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर लाईफ कसले. मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर कसले लाईफ. आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर लाईफ कसले.

पिडियॅट्रिक संगीतकार


कधी कधी आपल्याला काय बोलावे कळतच नाही. आपण फार विचार करतो काय बोलायचे याचा आणि शेवटी न बोलता ती वेळ घालवतो, पण सलीलचे अगदी उलट आहे. तो कधीही बोलण्याआधी विचार करीत नाही. बर्‍याचदा तो काय बोलणार आहे हे त्यालाही माहीत नसते. ‘अनप्रेडिक्टेबल’ या शब्दाचा खरा अर्थ काय ते सलीलला भेटल्यावर नक्कीच कळते. आयुष्य म्हणजे ‘रुटीन’ तेच तेच आणि जगणे म्हणजे ‘फॉरमॅट’ सगळे करतात तसे. या वागणुकीहून विपरीत जगणार्‍याला आपल्यात ‘सटक’ असे म्हणतात. तसाच एक सटक म्हणजे डॉ. सलील कुलकर्णी.

त्याच्याबरोबर गप्पा मारताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. विचारांची, भावनांची आणि आपलेपणाची बंपर ऑफर असलेल्या सलीलचा जन्म ६ ऑक्टोबर १९७२ मध्ये पुण्यात झाला. एकतर सटक, भन्नाट मुडी आणि त्यात पुणेकर म्हणजे कसले सॉलिड कॉम्बिनेशन असणार हे डॉक्टर याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येणे हे भाग्याचेच आहे, असे सलील सांगतो. कारण पु. ल., सुधीर फडके, अत्रे, टिळक, साहित्य, संगीत या सगळ्यांचे उल्लेखसुद्धा मध्यमवर्गीय घरांमध्येच होतात. प्रेमाच्या भिंती आणि संस्कारांचे छत यात सलीलचे बालपण गेले. संगीताची त्याच्या आयुष्यातली सुरुवात त्याच्या श्‍वासाच्या लयीवरच झाली असावी. अडीच वर्षांच्या सलीलने आकाशवाणीवर जयोत्सुते गायले होते. मला मिळालेले पहिले गिफ्ट होते एक हार्मोनियम. त्याने संगीताशी नाही तर संगीतानेच त्याच्याशी एक नाते जोडले असावे असे माझे मत आहे. त्याचे सुदैव असे की लहान गायक म्हणून त्याला कधी कुणी डोक्यावर बसवले नाही. पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमालाबाई शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडून त्याने गाण्याचे प्रशिक्षण घेतले. आधीपासून त्याला अभ्यासाचे वेड होते. आपण डॉक्टर व्हायचे हे त्याने ठरवले होते. म्हणूनच जोरजबरदस्ती आणि ढकलमपंची हा प्रकार शिक्षणात त्याने कधीच नाही अनुभवला. एमबीबीएस करीत असतानाच त्याने काही गाणी बनवली. शांता शेळके, पु. लं.सारख्या दिग्गजांनी त्याला दाद दिली. त्याक्षणी तो संगीताकडे वळला. पुराचे पाणी झाडांना ओढून नेते तेव्हा झाडांना चॉईस नसतो. तसेच मी संगीतात वाहून गेलो, असे त्याचे म्हणणे. संगीत दिग्दर्शन म्हणजे गोंगाट आणि स्टुडिओतील मशिनींची कमाल समजल्या जाणार्‍या काळात पेटीवर अप्रतिम चाली बसवणार्‍या सलीलला ‘हॅटस् ऑफ’ म्हणावेसे वाटते. एस. पी. बालसुब्रमणीयम, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, बेला शेंडेंसारख्या मोठमोठ्या गायकांना त्याने आपल्या चालींवर सुरांचा वर्षाव करण्याची संधी दिली आहे. संगीत म्हणजेच सलीलची अभिव्यक्ती. त्याच्यातल्या लहान मुलाला संगीतामुळेच मन मोकळे करता येते हेही तो सांगतो. एकटेपणाचे प्रदर्शन भरवणार्‍यांशी त्याचे अजिबात काही घेणेदेणे नाही. त्याला गर्दीत रमायला आवडते, गप्पा मारायला आवडतात आणि आनंद उपभोगायला आवडतो. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचे बाबा गेले. आईच बाबासुद्धा झाली.

आईने कोणतीही उणीव भासू दिली नाही. सलीलच्या वागण्यात जी माया जाणवते त्याचे खरे क्रेडिट कुणाला मिळायला हवे ते आता सर्वांना कळलेच असेल. प्रेमगीते असो किंवा बालगीते, सलीलचे संगीत मनाला भिडणारे असते. ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातील गाण्याच्या चाली नसत्या तर कदाचित त्या कवितांचे अर्थ कळले नसते, असे मला नेहमी वाटते. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गाणे गाणारा आणि ऐकणारा गाणे संपेपर्यंत डोळे पुसत राहतो. फक्त पेटी, तबला आणि भावना एकत्र आल्या की संगीत हृदयात खोलवर शिरते हे सलीलच्या संगीताने लक्षात येते. बालगीतांना संगीत देणे त्याला आवडते. ते कठीण असते. कारण लहान मुलांना राग, कौशल्य, अलंकार, षडज वगैरे काही कळत नाही. त्यांना गाणे आवडते किंवा आवडत नाही. ‘अग्गेबाई-ढग्गोबाई’ या बालगीतांच्या अल्बममधील गाणी मोठ्यांनाही आवडणारी आहेत. ‘मी पप्पांचा ढापून फोन’ या गाण्याने तर तुफान केले होते. सलीलचे आयुष्य म्हणजे त्याची आई रेखा कुलकर्णी, बायको अंजली आणि पोरं शुभंकर व अनन्या. अंजली ही प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांची कन्या. सलील सांगतो, ‘माझ्या दोन्ही पोरांचा आवाज अंजलीसारखा चांगला आहे हे नशीब.’ सलीलची स्मरणशक्ती फारच छान आहे. एकदा भेटलेल्या व्यक्तीलाही तो विसरत नाही. बाबा गेले तो त्याचा सर्वात वाईट दिवस होता. तो दिवस आजही ठळक आठवतो. त्याला हसायला आवडते, मित्रांसोबत गप्पांच्या मैफली रंगवायला आवडतात, पोरांसोबत खेळायला आवडते. ‘गेलेले क्षण परत येत नाहीत. त्यामुळे मी प्रत्येक क्षण जगतो’ असे तो सांगतो. मुलांच्या शाळेत पॅरेंटस् मिटिंगपासून ते मित्रांच्या गरजेच्या वेळेत मी असतो.’

क्रिकेटचे वेड आहे सलीलला. तेंडुलकर, युवराज आणि गांगुलीसोबत घरी जेवायला बसून क्रिकेट या विषयावर गप्पा मारणे हे स्वप्न सलीलसारखेच भन्नाट आहे. माझे मित्र, माझी माणसं हीच माझी संपत्ती आहे हे तो सांगतो. त्याचे अल्बम ‘आयुष्यावर बोलू काही’, नामंजूर, दमलेल्या बाबाची कहाणी, आनंद पहाट, संधीप्रकाश! आणि अनेक हे मनात घर करणारे आहेत. तो सांगतो, मी शर्यतीत नाही. मला कोणते स्टेशन गाठायचे नाही. माझ्या मुलांना व पुढल्या पिढीला माझ्या कार्याचा अभिमान वाटला पाहिजे एवढेच माझे ध्येय. खूप सुंदर विचार करणे, चांगली गाणी बनवणे, खूप प्रेम वाटणे हे सगळे या कार्यासोबत करायचे आहे. मनं जिंकायची आहेत. कोणतीही रेस जिंकायची नाही. त्याचे पुस्तक ‘लपवलेल्या काचा’ आजकाल फार चर्चेत आहे. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की वाचकाला हे आपणच लिहिले आहे असे वाटते. फार सुंदर शब्दांत सलीलने संपूर्ण आयुष्यच त्या पुस्तकात संचित केले आहे. २०७ पानांमध्ये कितीतरी प्रसंग, भावना व वर्ष लपलेली आहेत. हे पुस्तक वाचूनही संपत नाही. खरं तर या पुस्तकाच्या वाचनाची सुरुवात ते वाचून संपल्यावरच होते. पुस्तक अर्पण केलंय दोघींना. आईला व हार्मोनियमला. तरीही ते प्रत्येक वाचकाला त्यालाच अर्पण केलंय असे वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याचे संगीतवेड, क्रिकेटवेड, प्रेमळ स्वभाव, संगीत शाळा, त्याचे विद्यार्थी आणि जगण्याची इच्छा हे सगळे त्याच्या जगण्याचा पाया. कुटुंब, मित्रपरिवार आणि संगीत त्याच्या सगळ्यांचे कारण. तो प्रत्येकातल्या लहान मुलाला आपल्या संगीताने जागृत करतो. हसवतो, रडवतो, विचार न करता भावना व्यक्त करायला लावतो. त्याच्या कार्यक्रमात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत पोट धरून हसतातही आणि मान खाली घालून रडतातही. म्हणूनच हा डॉक्टर कम संगीतकार मला अगदी जवळचा वाटतो. अगदी के.जी.मधल्या टीचरसारखा किंवा गोड गोळ्या देणार्‍या लहान मुलांच्या डॉक्टरसारखा.

मुलांचे डॉक्टर तसे मोठ्या माणसातल्या लहान मुलाच्या भावनांचा डॉक्टर सलील याला आपण पिडियॅट्रिक संगीतकार म्हणायला काहीच हरकत नाही. सलील तू तुझा अजबखाना चालूच ठेव. आमच्या भावनांना वाचा दे. तुझ्या संगीताने सर्वांना थोडा वेळ का होईना पण लहान होण्याची संधी दे.