Thursday, May 19, 2011

आपण ज्ञानेश्‍वर नाही!!


येणार्‍या प्रत्येक क्षणात आपण काही ना काही शिकत असतो. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. याच अनुभवांच्या धाग्यात आपण आयुष्य गुंफत असतो आणि मी पाहिले तेच खरे आयुष्य असा हट्टही प्रत्येकजण निरनिराळ्या पद्धतीने करतो. ऑफिसमध्ये सहकार्‍यांना काम दिले की ते आपण करतो तसेच असावे ही अपेक्षा ठेवतो. ‘मी हे काम जास्त चांगले करू शकलो असतो’ असे अनेकदा तुम्ही बोललाही असाल. आपण सांगू ती प्रत्येक गोष्ट ऐकणार्‍याला कळलीच पाहिजे हा फार मोठा अन्यायकारक विचार आहे. ‘मी एवढ्या वेळा नीट समजावूनही कळत कसे नाही’ हे वाक्य पुन्हा उच्चारण्यापूर्वी एक लक्षात घ्या की, जसे तुम्हाला सर्व कळू शकत नाही तसेच इतरांनाही काही गोष्टी कळणार नाहीत. उलट असे अनेक भेटतील ज्यांना ‘समजण्याशी’ काहीच घेणेदेणे नाही. अशावेळी स्वत:चे रक्त आटवून स्वत:ला त्रास देणे म्हणजे वेडेपणा. झोपलेल्यांना उठवण्याचा प्रयत्न करा पण झोपेचे सोंग घेतलेले उठत नाहीत म्हणून रडत बसू नका. कधी कधी समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचेच नाही हे माहीत असूनही आपण ‘मी समजवणारच’ असा अट्टहास धरतो. असे करणे व्यर्थ. शेवटी दगड डोक्यावर मारला काय किंवा डोके दगडावर, जखम डोक्यालाच होते. जखमांचे धोपटे भरून कुढत राहू नका. प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारा. ती बदलण्याचा प्रयत्न करा आणि बदलत नाही म्हणून मदमस्त राहू नका. जीवनाच्या प्रवासात विविध आकार, प्रकार व विचाराच्या व्यक्ती आढळतील. काही तुमच्यासारख्या, काही अगदी वेगळ्या. इंद्रधनुष्यातील रंगांसारख्या या जगातील विविधतेचा आनंद घ्या. समजून घ्या, तुम्हाला समजणार्‍यांना आणि न समजणार्‍यांनासुद्धा. ज्ञानेश्‍वरांनी रेड्याकडून गीता म्हणवून घेतली. असेच रेडे रोजच्या जीवनात भेटत असतात. त्यांना गीता न समजल्याचे ओझे उचलून आयुष्य कठीण करू नका. तुम्ही ज्ञानेश्‍वर नाही हे लक्षात ठेवा आणि रेड्यांना ‘इट्स ओ के’ म्हणून सुखाने जगू द्या. समजा, समजवा पण हे विसरू नका की, ‘‘आपण ज्ञानेश्‍वर नाही!!’’

No comments:

Post a Comment