Friday, May 20, 2011

दुर्बीण लावून पहा...!!



विहिरीतल्या बेडकासारखे आपण जगत असतो. आपल्या डोळ्याला दिसते तेवढेच आपले जग असते. आपल्या नजरेपलीकडे काहीच नाही असा गोड गैरसमज बाळगून आपले आयुष्य सरत असते. प्रेम, समजूतदारपणा, राग, त्रास अशा सर्व भावनांच्या व विचारांच्या व्याख्या आपल्या मनात तयार असतात. अट्टहास असा असतो की आपल्याच व्याख्या खर्‍या. प्रत्येकाचा जगण्याच्या, वागण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जेवढी मनं तेवढे स्वभाव. हीच तर देवाची कमाल आहे. एका साच्यातून त्याने सर्वांना नाही काढले. आपण ज्याप्रकारे आपल्यांची काळजी घेतो, आपण अपेक्षा ठेवतो की इतरांनीही तसेच वागावे. तसे होत नाही. कारण ‘काळजी’ प्रत्येक जण आपापल्या परीने व पद्धतीने करत असतो. अपेक्षाभंगाच्या ओझ्याखाली दबून आपण जगणे स्वीकारतो. पण स्वभावांची विविधता समजून घेत नाही. आपल्या विचारांपलीकडेही विचार आहेत, जग आहे हे विसरू नका. आपल्या व्याख्या दुसर्‍यांवर लादू नका. दुसर्‍यांच्या व्याख्या समजून घ्या. एखादी आई ओरडते, एखादी गप्प होते. याचा अर्थ एकीचे प्रेम जास्त आणि एकीचे कमी असे नाही. गांधीजी उपोषणाला बसले आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेला उभे केले. मार्ग वेगळे पण प्रेम तेच, भावना तीच. गुलाब चांगले की जास्वंद, समुद्र डौलदार की झरे अशा विक्षिप्त तुलना करू नका. परमेश्‍वराने घडवलेली प्रत्येक गोष्ट अप्रतिम आहे व कोणत्याही दोन गोष्टी सारख्या नाहीत. तसेच माणसांचे स्वभावही सारखे नाहीत. या वेगळेपणाचा आनंद घ्या. ‘असेच वागले पाहिजे, तसेच बोलायला हवे’ हे हट्ट धरू नका. तुमच्या व्याख्या तुमच्याजवळ. निरनिराळ्या व्याख्यांचे निरीक्षण करा.
नजर एका दिशेत असते,
असतात मात्र दिशा दहा,
सोडू नका जग आपले,
तुम्ही तुमच्याच जगात रहा,
पण जवळ जवळचे पाहणार्‍यांनी,
एकदा दुर्बीण लावून पाहा..!

No comments:

Post a Comment