Thursday, May 19, 2011

अ...ब...क...ड...


तू असं का बोललास? तू असे बोलू कशी शकते? त्याने असे का म्हणावे?... अर्धे आयुष्य आरोप करण्यात आणि खेद व्यक्त करण्यात निघून जाते. शब्दांच्या जाळ्यात आपण गुरफटून जातो. त्या शब्दांचे अर्थ शोधतो पण त्यामागच्या भावना पाहणे राहून जाते. खरं तर भावना महत्त्वाच्या. आई-वडिलांच्या रागात, बॉसच्या विचित्रपणात, लहान मुलांच्या चिडचिडीत, मित्र-मैत्रिणींच्या गैरव्यवहारात शब्द नका पाहूत. भावना समजून घ्या. देवही भावनांवरच आपले आयुष्य चालवतो, आपले शब्द, मागण्या आणि फिर्यादी ऐकून नाही. एका गावात एक देऊळ होते. रोज एक शेतकरी त्या देवळात यायचा. काहीतरी पुटपुटायचा देवापुढे आणि हे बरेच दिवसांपासून त्या देवळाचा पुजारी पाहत होता. तरुण पुजारीही आपल्या मंत्रांच्या वर्षावात देवाला भिजवून टाकायचा. शेतकरी आणि पुजारी दोघेही देवाकडे प्रगती व चांगल्या आयुष्यासाठीच मंत्रांचा मारा करायचे. शेतकर्‍याचा उत्कर्ष होत गेला. तो मोठा होत गेला. वर्षे सरली. तो पुटपुटून जायचा आणि प्रगती त्याच्या दारात धावून यायची. एकदा पुजार्‍याने देवळात आलेल्या शेतकर्‍याला विचारले, ‘तू कोणता मंत्र म्हणतोेस. मीही मंत्र म्हणतो तरी माझी प्रगती होत नाही. तुझा मंत्र सांग!’ त्यावर शेतकरी म्हणाला, ‘मला कोणताही मंत्र येत नाही. मी देवासमोर उभा राहतो आणि बाराखडी म्हणतो. अ ब क ड आणि देवाला सांगतो ऍडजेस्ट कर, समजून घे. माझ्या भावना देवाला कळतात. या शब्दांना अर्थच उरत नाही मग. कुणीतरी काहीतरी बोलले, ते आपलेच आपल्याला दुखवून गेले असा विचार सोडा. त्यांच्या बाराखडीवर मतं तयार नका करू. रागामागचे प्रेम, संशयामागची काळजी, मौनामागची आतुरता या समजण्याच्या गोष्टी आहेत. भावनांना शब्दांच्या मेहेरबानीवर जगवू नका. भांडण-तंटे, द्वेष, राग, रुसवे हे शब्दांमुळेच होतात. भावनांना महत्त्व द्या शब्दांना नंतर. आपल्यांची बाराखडी समजण्याचा प्रयत्न करा.
अ...ब...क...ड...

No comments:

Post a Comment