![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiW-hOvmbQKr0TqwDxXMkiFFNuxolkancg68EnQC4kyWZ71Qx1XFL5pazyQHaAmyBbutVkyQaUjB6xvTFqWnwjTkfXeFgeoj6dcKHaRi2tCxLfh_ZFqk8vxfIMbQc3z4mKfCq_MM5lYNaI/s400/mashal.jpg)
आयुष्याचे हे असेच असते. सर्व काही सरळ सुरळीत चालत असताना अचानक काहीतरी नवीनच समोर येते. अनेकदा आपल्यावर जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण गोंधळून जातो. ऑफिसच्या जबाबदार्या, घरची कर्तव्ये आणि आपले मन, सगळं काही सांभाळता सांभाळता जीव जायची वेळ धडकते. त्यात सल्ले देणार्यांचीही कमी नसते. प्रत्येक मिळालेल्या सल्ल्याने आपल्या विचारांची दिशा बदलत जाते. कधी हे तर कधी ते अशा विचारांच्या पकडापकडीत आपण दमून जातो, पण निर्णय मात्र घेता येत नाहीत. ‘‘कुणाचे ऐकू, कुणावर विश्वास ठेवू, मला नक्की काय करावे कळत नाही!’’ अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा एक लक्षात ठेवा, सांगणारे काहीही सांगतील, काही खूप चांगले आणि काही अगदी बिनडोकपणे, पण आपले निर्णय आपणच घ्यावेत. आपल्या सर्व बाजू सांभाळून जे सोयीचे असेल तेच करावे. कुणीतरी सांगितले म्हणून मी केले हे शहाणपणाचे लक्षण नाही, बर्याचदा आपण निर्णय घेण्यापासून लांब पळतो. भीती वाटते म्हणून नाही तर निर्णय चुकला तर आपल्यावर कुणी बोट दाखवू नये म्हणून. स्वत:च्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसर्यांच्या हाती देऊ नका. जे मनाला पटते ते न घाबरता करा. सकारात्मक विचार, आपल्यांची खुशी आणि आपली मर्जी यांची काळजी घेऊन घेतलेला निर्णय सहसा चुकत नाही. नैतिकता आणि माणुसकीबद्ध निर्णयांना तसा चुकण्याचा अधिकारच नाही. काही कारणास्तव निर्णय चुकले तरी ते निर्णय आपणच घेतलेले असल्यामुळे जगावर किंवा कुणावर रागराग करण्याची गरजही उरत नाही. असेच अनेकदा आपल्या आयुष्यात नकारात्मक विचारांचे विष कालवणारेही सापडतील. आपल्या निश्चयांवर व निर्णयांवर फणा मारून दंश करतील, पण सकारात्मकतेच्या प्रकाशाने त्या नकारात्मकतेचा सामना करा. उगाच गोंधळून जाऊ नका. काल, उद्या, चूक, हार, अंधार हे सारे विसरा. लक्षात ठेवा माणुसकी, आज, नैतिकता आणि प्रकाश.
आताच माणसांची गाणी शिकून आलो,
आताच मी उद्याला सारे पुसून आलो,
विकला जरी कुणीही अंधार माणसांना,
माझी मशाल आता मी पेटवून आलो!
योग्य ते पटणारे निर्णय घ्या... स्वत:च घ्या... अंधारात आपली मशाल पेटवून ठेवा...
No comments:
Post a Comment