![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQATX4Gl9dXCp11eBjazH9ikyhz6ywaDFXonMk58pRi8BiOMP_3WR3BGXXiJ6-Dk_MFtXvsBRa43DTyLaRYS5vm-pxmKMYIOf8eR6aYOqMkQYpRS41OdBoC7y39wVmBFvCSMqaJh9J41M/s400/Marathi.jpg)
‘ए पोरा, मेदूवडा सेप्रेट लाना, सांबार मे बुडाके मत लाना.’
‘इतना महाग कैसा रे तेरे यहॉं? वो कोपरे का भैया तो स्वस्त देता है.’ घाई करो रिक्षावाले, नही तो बस आएगी और मेरी पंचाईत होगी.
असे काहीसे गोड कानावर पडले की आपलेच कुणीतरी जवळपास असल्यासारखे वाटते. हो, आपलेच म्हणजे जगाची काळजी करणारा आणि स्वत:च्या जगात जगणारा मराठी माणूस. खरं तर हा फक्त आठवड्याचाच नाही तर आयुष्याचा माणूस आहे. याला भावनांचा सम्राट म्हणायला हरकत नाही. दु:ख झाले की डोळ्यांतून पाणी काढतो, चिडला की आक्रमक होतो, आनंद झाला की वेडापिसा होतो. भावनांच्या लाटांमध्ये आयुष्याची होडी फिरवणार्या या मराठी माणसाला कुणी आळशी म्हणाले, कुणी मोर्चेबाज म्हणाले, कुणी गुंड म्हणाले तरी तो मात्र पुरेपूर जगण्याचा कॉण्टॅ्रक्टच करून जन्माला आला आहे. मिळेल त्यात समाधान मानणार्या मराठी माणसाची पिढी आता संपत आली. नवा तरुण मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात आपले नाव करत चाललाय. 9 ते 5 सरकारी नोकरीच करीन हा हट्ट सोडून मराठी माणूस बिल्डिंग बांधतो, सॉफ्टवेअर बनवतो, चित्रकला जोपासतो. मराठी माणसाचे आयुष्य, जग, राहणी, विचार सर्वकाही काळाबरोबर बदलत आहे. पूर्वीचा मध्यमवर्गीय मराठी माणूस उभ्या-आडव्या चाळीत राहायचा. नोकरी करावी व सांभाळावी. संध्याकाळी टी.व्ही.समोर बसावे. बातम्या पाहून सरकारला 4-5 शिव्या द्यायच्या. रविवारी दुपारी झेपत नसेल एवढे जेवून एक सॉलिड झोप काढावी. संध्याकाळी जवळपास चक्कर टाकावी. एवढे सरळ होते त्याचे आयुष्य. त्याच्या सुखाला नजर लागली ती त्याचीच. आपल्या-आपल्यातल्या राग-रुसव्यात तिराईतांनी फायदा साधला. दादर-गिरगावातले जोशी, पटवर्धन, भाटकर हे कल्याण, ठाणे, बोरिवली, दहिसरला जाऊन वसले. काहींनी तर पुण्याची वाट धरली. याने प्रदूषणाचे कारण पुढे केले पण मुंबईत राहणे त्याला जमत नाही हे त्याला आतून कळत होते. आजही तो दिवाळी-दसर्याची खरेदी करण्याकरिता दादर-गिरगावलाच येतो. आपल्या कुटुंबाची देखभालच नाही तर स्वप्नांची पूर्ती करणेही त्याच्या जीवनाच्या यादीत आता आढळते. धंदा करण्याकरिता लबाडी, चोरी करायची त्याची मानसिकता नाही पण पडेल ते काम करून हवे ते मिळवणारच असा अट्टहास नव्या मराठी पिढीने धरला आहे. स्वातंत्र्यानंतर देशभर भाषिक राज्याच्या रचनेस केंद्राची मान्यता होती. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त असतानाही आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी असतानाही ती महाराष्ट्राला द्यावी की नाही या संभ्रमात दिल्लीतले नेते होते. मुंबईला तोडून स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा असे त्यांना वाटत होते. लेखक, पत्रकार, कलावंत, विचारवंत, समाजसेवक आणि सर्वसामान्य माणसांनी सरकारविरुद्ध लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली त्यात 106 हुतात्मे झाले. 1 मे 1960 याच दिवशी मराठी माणसाची मुंबई त्याला मिळाली असे म्हणता येईल. बर्याच जणांसाठी हुतात्मा चौक हा फक्त बसचा एक स्टॉप आहे, पण ‘मी मराठी’चे वारे जोरात चालत असल्यामुळे आज सर्वांना या इतिहासात रस वाटू लागला आहे. मराठी माणसांची गंमत सांगायची तर अशी की गोड खायला सण नाही आणि विरंगुळ्यासाठी सुट्टी लागत नाही. माझे कुटुंब, माहेर, ऑफिस... एकदा का एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला माझे म्हटले की मग त्यासाठी काहीही करायला तयार. तलवारीमध्ये तरबेज असलेला मराठी माणूस आता तराजूतही तरबेजपणा दाखवतो.
माशेलकर, किर्लोसकर, तिरोडकर, कुलकर्णी, भोसलेंसारखी नावे उद्योगात गाजतात. कधीकाळी इंग्रजीला घाबरणारा मराठी माणूस वाक्यातील 3-4 शब्द तरी इंग्लिशमध्येच बोलतो. वडापाव हा त्याचा वीक पॉइंट. कधीही, कुठेही, कितीही हा मंत्र वडापाव खाण्यासाठी चोख आहे. जेवणाच्या ठिकाणी वडापाव खाऊन ‘जाम खाल्ले रे’ म्हणणार्या मराठी माणसाला वरणभात, भाजी आणि रविवारच्या मटणाचा स्वर्ग हवाच त्याचबरोबर तो आजकालच्या पिझ्झा, बर्गर, पास्ता कल्चरमध्येही रुळला आहे. विरार लोकलच्या गर्दीत गरोदर मराठी स्त्रिया स्वेटर विणत, घरचे हिशेब लिहीत घरची सुखदु:खं वाटून मन हलके करतात व पुरुषांसारखेच घरखर्चात त्याच तोडीचा हातभार लावतात. मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो हे मला पटत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातल्या एका प्रसिद्ध संवादामध्ये हे स्पष्ट होते. प्रत्येक समाज त्याचा इतिहास, भूगोल व सामाजिक परिस्थिती यानुसार बदलत जातो व त्याप्रमाणे त्या समाजात सामाजिक पद्धती रूढ होत जातात. गुजरात किंवा इतर राज्यांत चांगली कामं होत आहेत म्हणून आपण कमी हे म्हणता येणार नाही. घोडा अडीच घर चालतो म्हणून उंटाला तसे चालता येत नाही. तो त्याच्या पद्धतीनेच तिरपा जाणार. प्रत्येक जण त्याची चाल चालतो. मराठी माणूसही त्याच्या पद्धतीने पुढेच जात आहे. जगभर मराठी पसरले आहेत व आपल्या मराठीपणाचा अभिमान राखून तो वाढवत जगत आहेत. भगवा झेंडा, पुरणपोळी, जय महाराष्ट्र, वरणभात, चितळेंची भाकरवडी, कोल्हापूरची आंबा बर्फी यातला कोणताही शब्द उच्चारला तरी मराठी माणसाला अगदी भरून येईल. मराठी माणसाला ‘जागे हो’ असे सांगण्याची गरज मला वाटत नाही. कारण तो झोपलेला नाही. तो हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो, तो समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो हा त्याचा मोठेपणा आहे. तो प्रत्येक प्रसंगात पाण्यासारखा वागतो. आकार व रंग परिस्थितीनुसार घेतो. त्याला कळते कुटुंबासोबत हक्काचे दोन घास जेवणे आणि लग्नकार्य, सणांना, आपल्या सर्वांना खूश करणे. एवढे केले की तो समाधानी. याचा अर्थ तो आळशी असा नाही. तो खूप कष्ट करतो. छोटी स्वप्नं पाहतो. छोटे आनंद कुरवाळतो आणि भरपूर जगतो. देवावर विश्वास ठेवणारा हा मराठी माणूस आता स्वत:वरही विश्वास ठेवत आहे. मोठा होत आहे व आपल्यासोबत अनेकांना मोठे करीत आहे. मराठी माणसाला आजच्या दिवशी मानाचा मुजरा आणि एक सल्ला
भरपूर जगो,
पेटभर खाओ,
खूप मज्जा करो
आणि काहीही करनेको लाजो मत!!!
No comments:
Post a Comment