Sunday, May 29, 2011

मी हरत नाही.....



हरणे कुणालाच आवडत नाही. मग त्या शाळेतील कबड्डीच्या स्पर्धा असो, कार्यालयातील चढ-उतार असो किंवा आयुष्याचा खेळ असो, प्रत्येकाला जिंकायचे असते. प्रयत्न आणि कष्टाचे खतपाणी टाकण्यास मागे पुढे झाले तरी यशाचे पीक मात्र अपेक्षित असतेच. तरीही आपण फार पटकन शस्त्र टाकून मोकळे होतो. अडथळ्यांशिवाय जगण्याचा कोणताही मार्ग नाही. छोट्या अडथळ्यांना संकट मानून, घाबरून आपण हरलेल्या माणसांच्या यादीत झटकन आपले नाव नोंदवून टाकतो. स्वत:वर व स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास न ठेवता आपण परिस्थितीच्या आहारी जाऊन लाचारीच्या अंथरुणात डोळे मिटून पडतो. ‘मी हरलो, मी आता काही करू शकणार नाही’ हे म्हणणे फक्त अन्याय नसून गुन्हा आहे. धडपडणे हा गुन्हा नाही, पण परत न उठणे व स्वत:ला सावरण्यास नकार देणे हा महा गुन्हा आहे.

त्याहून मोठा गुन्हा म्हणजे हरण्याच्या भीतीने प्रयत्नच न करणे. मरणाच्या भीतीने कुणी श्‍वास घेणे सोडत नाही तसे पराजयाच्या भयाने थांबणे हे संपण्यासारखेच. भीतीने कोलमडून पडलेल्यांचे आयुष्य म्हणजे प्रवास नसून फरफट असते. आपली हार-जीत आपल्या मानण्यावर असते.नकारात्मक विचार दिशाहीन करतात. धडपडलात तरी पराजयाची भावना मनात विरघळून देऊ नका. ‘पडल्यावर बसून राहू नका. उठून पुढे चाला. इंटरव्हलला ‘दी एण्ड’ समजून बाहेर पडू नका. असे अनेक प्रसंग येतील जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल. स्वप्नांवर जळमटे लागल्यासारखे वाटेल. आता पुढे काहीच उरले नाही हा भाव मनात घर करील, पण अशावेळी घाबरू नका. समजा हे मध्यांतर आहे. नाटकात बरीच मध्यांतरे येतात आणि नाटकाचा अंत हा सुखीच असणार. त्यामुळे जो पडाव सुखी नाही तो अंत नाही हे लक्षात घ्या. थांबू नका. उठा, कामाला लागा. अडथळ्यांना झुंज द्या. स्वत:ला साथ द्या. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या डोळ्यात बघून सांगा, ‘‘मी हरणार नाही, मी हरत नाही.’’

दु:ख आले किती भयंकर,
त्यात कोणी मरत नाही.
चितेच्या आगीस भिऊन,
श्‍वास बंद ही करत नाही;
वेळ वेळेच्या प्रमाणे
मजप्रमाणे सरत नाही
अन् जरी पडले व रडले
मी तरीही हरत नाही!

No comments:

Post a Comment