Thursday, May 19, 2011

यम दूताचा कट्टर दुश्मन



सगळ्यांना सोपी गणितं आवडतात. सुरळीत आयुष्याची चटक प्रत्येकाला असते. परीक्षेला जाताना बुद्धी व बळ मागणारे कमी आणि ‘पेपर सोपा असू दे’ अशी प्रार्थना करणारे जास्त असतात. पण डॉक्टर प्रफुल विजयकर यांचे अगदी उलट आहे. सर्व डॉक्टर्सनी शस्त्र टाकले व सर्व हॉस्पिटल्सनी नकारघंटा वाजवली की लोक विजयकरांकडे येतात. हल्ली तर त्यांची अपॉइंटमेंट मिळता मिळत नाही. ‘अशक्य आजार असेल तरच डॉक्टर पाहतील’ हे ऐकून मी हादरले. हसत मी मनात म्हटलेही की डॉक्टर विजयकरांना भेटायचे असेल तर भयंकर आजार झाल्याशिवाय कठीणच आहे. खरं तर प्रफुल विजयकर यांचा प्रसन्न चेहरा आणि कोलगेट स्माईल अर्धा आजार दूर करतच असेल. त्यांची सकारात्मक वृत्ती, त्यांच्या उपचारावरचा व होमिओपॅथी या विज्ञानावरचा विश्‍वास आणि कठीण आव्हानांना स्वीकारायची क्षमता हेच त्यांचे गुण त्यांच्या यशाचा पाया ठरतात. 4 ऑगस्ट, 1952 रोजी मुंबईत जन्माला आलेले प्रफुल विजयकर फार लहानपणीपासून डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहत होते. त्यांचे दोन्ही आजोबा, वामनराव विजयकर व मुकुंद कोठारे डॉक्टरच होते. वडील गजानन विजयकरदेखील डॉक्टर असल्यामुळे दुसरा कोणताही पर्याय कधीच त्यांच्या मनात आला नाही. सर्जन व्हायचे स्वप्न रंगलेले असतानाच एका ज्योतिषाने त्यांच्या आईला सांगितले, ‘तुमचा मुलगा फार मोठा सर्जन होईल.’ ज्योतिषानेही त्या स्वप्नात काही अजून रंग कमी पडले. पण नियती कुणालाच कळत नाही हे खरे आहे. 3 मार्क कमी पडले आणि एम.बी.बी.एस.चे ऍडमिशन चुकले. डॉक्टर व्हायचेच म्हणून होमिओपॅथीही चालेल असे वडिलांनी सांगितले आणि त्यांनी इच्छा नसतानाही होमिओपॅथीचा अभ्यासक्रम सुरू केला. प्रामाणिकपणे शिक्षण पूर्ण करून ते आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत. येणार्‍या रुग्णांची तपासणी करता करता ते ऍलोपॅथीही शिकत होते. एकदा एका माणसाला ऍलोपॅथीने गुण येत नसल्यामुळे सहज होमिओपॅथीचे औषध दिले व त्याने त्याला बरेही वाटले. ते रुग्ण होते सरजुप्रसाद तिवारी. कोणतेही औषध लागू पडत नसताना विजयकरांनी काहीतरी कमाल केली आणि तिवारीजींचा जुना आजार बरा झाला. तिवारी त्यांना म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही होमिओपॅथीच का नाही देत. तुमच्या हातात जादू आहे.’’ त्यावर विजयकर म्हणाले, ‘‘माझ्याकडे जागा असती तर तसे केले असते.’’ तिवारींनीही एक वेगळीच कमाल केली. दुसर्‍या दिवशी एक चावी आणून प्रफुल विजयकरांच्या हातात ठेवली आणि म्हणाले, ‘‘ही आजपासून तुमच्या दवाखान्याची चावी.’’ इथून सुरू झाला डॉ. प्रफुल विजयकरांचा खरा प्रवास. ना ऍग्रीमेंट ना पैसे ना डिपॉझिट, फक्त विश्‍वासावर व त्यांची जादू अनेकांना लाभावी म्हणून तिवारींनी त्यांना त्यांची जादूगिरी दाखवायला एक जागा दिली. 3 वर्षांत ही जागा तिवारींना त्यांनी परत केली, पण आजही सरजुप्रसाद यांचा विश्‍वासच माझे भांडवल होते असे ते सांगतात. त्या काळात होमिओपॅथीवर हसले जायचे. तथ्य असूनही या विज्ञानाची खिल्ली का उडवली जाते या शोधात त्यांनी स्वत:ला बुडवले. एम.डी. या परीक्षेला लागणारी सर्व पुस्तके त्यांनी विकत घेतली व त्यांचा नीट अभ्यास केला. त्यांच्याप्रमाणे होमिओपॅथीचे उपचार हळू होतात हे फार खोटे आहे. ते म्हणतात, अशक्य काही नाही. ते सांगतात की, सर्व आजारांची सुरुवात मनातून होते. मन आदेश देते आणि देह तो आदेश पाळतो. थ्री इडियट या चित्रपटातील एक डायलॉग ते सर्वांना ऐकवतात, ‘‘गलेपर कितना प्रेशर पडा ये हम माप सकते है, मगर दिमाग पर पडनेवाले प्रेशर को मापने की मशीन नहीं है.’’ प्रत्येक आजाराचे मनातील मूळ जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आजारही रेंगाळत राहतो. ‘‘मी आजारावर हल्ला करत नाही, मी प्रतिकारशक्ती वाढवतो’’ असे ते सांगतात. देवाने आपल्याला अफाट प्रतिकारशक्ती दिली आहे. त्याचा नीट वापर करून आजार नाहीसा करणे यालाच ते खरा उपचार समजतात. गोव्यात एका गोबर गॅसच्या टाकीत पडून एकजण 65 टक्के भाजला होता. सर्वांनी हात झटकलेले. त्याची अवस्था पाहून विजयकरांनी त्याचा स्वभाव, राहणी, इतर पूर्वीचे त्रास, आई-वडिलांची माहिती घेतली व एक औषध सांगितले. 3 तासांत त्याचा ऑक्सिजन पम्प काढता आला. तो श्‍वास घेऊ शकला व आज तो 3 महिन्यांनंतर परत पूर्वीसारखा झाला. डॉक्टर सांगतात, मनातले त्रास आजारांना जन्म देतात तसेच मानसिक उपचाराने मरणकळाही दूर होऊ शकतात. उदाहरणार्थ पुढे अंधार व त्रास पाहणार्‍यांना कॅटरॅक्टचा त्रास होता. घोर दु:ख व घाव साठवलेल्यांना कॅन्सर होऊ शकतो व आधार नसण्याचे भाव बाळगाणार्‍यांना हाडांचे विकार होतात. सर्व काही सुरू होते ते मनातून. वरवरच्या गोळ्या खाऊन तात्पुरते बरे होण्यात काही फायदा नाही. ‘‘मन आणि शरीराचा ताबा देण्याचे काम मी करतो’’ असे त्यांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला झाला की होमिओपॅथी चालते. इतर वेळी नाही. हा चुकीचा समज आहे. डॉ. विजयकरांकडे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, अंधत्व, किडनी फेलीयर, मेनीनजायटीसपासून ते ल्युकेमिया, थालेसेमीयापर्यंत सर्व उपचारांसाठी रुग्ण येतात. तरंग व अंबरीश त्यांचे दोन पुत्र. अंबरीशसुद्धा होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत व आपल्या वडिलांना सहकार्य करतात. मेनीनजायटीसने 100 टक्के आंधळा झालेला राजेंद्र आता फोटोग्राफीचे काम करतो, ब्रेन ट्यूमरने मरायला टेकलेली एनडीली गावातील मुलगी आज पाहू शकते ते फक्त डॉक्टरांमुळे. असे अनेक लोक आहेत, ज्यांना स्वर्गाच्या दारातून विजयकरांनी परत आणले आहे. पण त्याचे श्रेय देतात ते त्यांच्या पत्नी प्रीतीला. आयुष्यभर माझी वाट पाहत राहणे व माझ्या संसाराचे नंदनवन करणे हेच तिचे ध्येय होते. आज त्यांच्यासाठी डॉक्टर थोडा वेळ काढूही लागले आहेत. प्रीती विजयकरांना आपल्या पतीच्या कार्यावर गर्व आहे. मोफत शिबीर करून ते वर्षभर आपली जादू दाखवतच असतात. मुंबई, बीड, महाबळेश्‍वर व इतर अनेक ठिकाणी ते जाऊन रुग्णांची सेवा करतात. ‘सगळ्यांनी नकार दिला असेल तर लगेच या’ हे त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे ‘पेपर कठीण असेल तर लवकर वाटा असेच वाटते.’ त्यांना ‘‘आईनस्टाईन ऑफ होमिओपॅथी असे म्हणतात.’’ त्यांना काहीही म्हणत असो, पण मला ते यमदूताचे जानी दुश्मन वाटतात. चित्रगुप्ताने नाव लिहिले की तोही विचार करत असेल की, या माणसाला डॉ. प्रफुल विजयकर भेटले तर पुस्तकात फुकट खाडाखोड होईल.
डॉ. प्रफुल विजयकरांची जादू पसरावी, अनेकांना त्या जादूने आयुष्य मिळावे. यमदूताचे अनेक पुढले प्लॅन फ्लॉप करण्याकरिता मी डॉक्टरांना शुभेच्छा देऊ इच्छिते. होमिओपॅथीवर हसण्याआधी ते विज्ञान समजण्याचा प्रयत्न करा. जीव कुणाचाच गेला नाही. मात्र या विज्ञानाचा वापर करून विजयकरांनी अनेक जीव वाचवले. मन आणि शरीर गोळ्यांनी भरू नका. प्रतिकारशक्ती वाढवून पहा. होमिओपॅथीला नावे ठेवण्याआधी विजयकरांचे चमत्कार पहा.

No comments:

Post a Comment